Shri Durga Shikshan Sanstha's

Shivprasad Sadanand Jaiswal College

Arjuni - Morgaon, Dist. - Gondia, 441701

Center for Higher Learning and Research || UGC Recognized Under 2(f) & 12(B)

Reaccredited With 'B' Grade by NAAC || ISO 9001:2015 Certified

Permanently Affiliated to Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University, Nagpur

SSJ arjuni founder

एस.एस.जे. महाविद्यालयात ‘दीक्षारंभ २०२६’ उत्साहात साजरा

अर्जुनी मोरगाव: श्री दुर्गा शिक्षण संस्थेच्या शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालय, अर्जुनी मोरगाव येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाने कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील प्रथम वर्षाच्या नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी वार्षिक ‘दीक्षारंभ २०२६’ या सर्वसमावेशक विद्यार्थी प्रवेशोन्मुख कार्यक्रमाचे आयोजन केले. महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणातून उच्च शिक्षणाच्या टप्प्यावर सहजतेने प्रवेश करण्यास सहाय्य करणे, तसेच महाविद्यालयीन संस्कृती, शैक्षणिक संरचना आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध विविध सहाय्यव्यवस्थांची ओळख करून देणे हा होता.

कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्राचार्य ईश्वर एस. मोहुर्ले, तर प्रमुख अतिथी म्हणून श्री मयंक जायस्वाल, सहसचिव, श्री दुर्गा शिक्षण संस्था,  तसेच कार्यक्रमाचे संयोजक तथा अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. लक्ष्मीकांत कापगते यांच्यासह महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापकांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. लक्ष्मीकांत कापगते यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची उद्दिष्टे व हेतू स्पष्ट करत कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी मान्यवरांनी नवागत विद्यार्थ्यांचे आपुलकीने स्वागत करून महाविद्यालयातील उपलब्ध शैक्षणिक व इतर सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच शिस्त, शैक्षणिक गुणवत्ता आणि सहशैक्षणिक उपक्रमांतील सक्रिय सहभाग यांचे महत्त्व अधोरेखित केले.

यानंतर विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची ३+२+१ अभ्यासक्रम संरचना, अपार क्रमांक, सतत अंतर्गत मूल्यमापन आणि सत्राअंतीच्या  परीक्षा यांसारख्या मूल्यमापन पद्धतींची सविस्तर माहिती देण्यात आली.

शाखानिहाय शैक्षणिक संरचनेचे मार्गदर्शन करताना डॉ. मोतीलाल दर्वे यांनी कला शाखेतील सुधारित सत्ररचना, अभ्यासक्रम व श्रेयांकांची माहिती दिली. डॉ. सतीश बोरकर यांनी वाणिज्य शाखेतील अभ्यासक्रमाची प्रगती व शैक्षणिक संरचना स्पष्ट केली. तर डॉ. लक्ष्मीकांत बोरकर यांनी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक प्रशिक्षण, अभ्यासक्रमातील श्रेयांक आणि प्रयोगशाळा-आधारित शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले.

विद्यार्थी कल्याण व सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने डॉ. भरत राठोड आणि श्रीमती कविता वासनिक यांनी विद्यार्थी कल्याण योजना, विविध शिष्यवृत्ती योजना तसेच शिष्यवृत्तीसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती दिली. डॉ. नितीन विलायतकर यांनी एस एस जेसी करिअर अकॅडेमीच्या  माध्यमातून उपलब्ध असलेल्या करिअर मार्गदर्शन, कौशल्य-विकास, स्पर्धा परीक्षा व रोजगाराभिमुख संधींची माहिती विद्यार्थ्यांना दिली.

डॉ. शरद मेश्राम, सहशैक्षणिक उपक्रमांचे प्रभारी, यांनी विद्यार्थ्यांना सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक व विविध सहशैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. डॉ. आशिष कावळे, कार्यक्रम अधिकारी, यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, सेवाभाव व पर्यावरणविषयक जाणीव विकसित करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व स्पष्ट केले. श्री. अजय राऊत यांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील उपलब्ध सुविधा, नियम, वाचनसाहित्य व संदर्भसाधनांची माहिती देत विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय जोपासण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. ईश्वर एस. मोहुर्ले यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा केवळ पारंपरिक वर्गशिक्षणापुरता मर्यादित नसून, त्यामध्ये शैक्षणिक प्रगतीसोबत व्यक्तिमत्त्व विकास, मानसिक व सामाजिक स्वास्थ्य, कौशल्यविकास आणि भविष्यासाठीची तयारी यांचाही समावेश असल्याचे स्पष्ट केले. कोणताही विद्यार्थी महाविद्यालयीन प्रवासात स्वतःला असहाय्य किंवा एकाकी समजू नये, यासाठी महाविद्यालयाच्या वतीने वैयक्तिक मार्गदर्शन, शिष्यवृत्तीच्या सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांनुसार सहाय्यव्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधींचा सक्रियपणे उपयोग करून आपल्या ध्येयाकडे सातत्याने वाटचाल करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या अखेरीस आयोजित संवादात्मक प्रश्नोत्तर सत्रात नवागत विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम, परीक्षा, शिष्यवृत्ती, ग्रंथालय व विद्यार्थी सहाय्य सुविधांबाबत विविध प्रश्न उपस्थित करून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. डॉ. मनोज बंगाडकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर डॉ. स्वाती मडावी यांनी आभार प्रदर्शन केले. नवप्रवेशीत  विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनाची सर्वसमावेशक ओळख करून देणारा हा कार्यक्रम त्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी आत्मविश्वासपूर्ण व सकारात्मक प्रारंभ ठरला.